आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
रामतीर्थ: बिलोली तालुक्यातील ग्राम रामतीर्थ,टाकळी अळदी खतगाव गळेगांव, थडीसावळी, आदमपूर परिसरातिल शेत शिवारात सोयाबीन पीक बहरल्याचे व शेतकऱ्यांकडून निंदण, खुरपण व कोळपे मजूरदार वर्गाकडून शेतोशेती शेतीकाम करतानाचे आश्वासक समाधानकारक सद्यस्थितीत चिञ पहावयास मिळत आहे.
बऱ्याच अवधीनंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर परिसरातील शेतकरी वर्ग नाराज असल्याची परिस्थिती होती. पण, त्यानंतर पावसाने अवचित हजेरी देऊन शेतकऱ्यांना आनंदीत केले. मग वापसा आल्यानंतर शेत शिवारात माजलेले गवत, तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली.
बैलांची गगावोगावी कमी झालेली संख्या असल्याने कोळपे धरण्यास बैलजोडी मिळत नाही. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, अशा शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा एकरी भाव देत, कोळपणी सुरू आहे. आया बाया मजूरवर्ग एकरी हिशोबाने गुत्ता किंवा मजूरी घेत निंदण करीत आहेत. वरील काहीही मिळत नसल्याचे पाहून काही शेतकरी सायकल दुंड्याची कोळपणी करताना दिसून येत आहेत. सोयाबीन पिकास पहिली कीटकनाशक फवारणी तर काही शेतकरी पिकांमध्ये तणनाशक फवारणी ही केलेली आहे. कधी रिमझिम पावसाची सळक तर कधी गार वारेही सुटत आहेत. सद्यस्थितीत रामतीर्थ परिसरात सोयाबीन पीक बहरले आहे.
